Maharashtra Weather: पुढचे २४ तास हाय अलर्ट! या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस पडला आहे. पुढचे २४ तास हे अत्यंत महत्त्वाचे सांगण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे.
त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे. मुंबईत पुढचे काही तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याचसोबत छत्रपती संभाजी नगर, पुणे घाट आणि रायगड या जिल्ह्यांना उद्यादेखील ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढच्या ४८ तासात या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे.यामुळे आज सकाळी अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. याचसोबत पावसाचा रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला होता. दरम्यान, आता मुंबईसह उपनगरात पावसाने उसंत घेतली आहे.
आयएमडी मुंबईनुसार, पुणे, रायगड, अहमदनगर, बीड आणि लातूर येथे जोरदार वारे आणि गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीने या आठवड्यात महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, ’16 सप्टेंबर रोजी कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक/काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस/गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.’ तसेच, 15 आणि 16 सप्टेंबर रोजी कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अलर्ट म्हणजे काय?
रेड अलर्ट म्हणजे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट ही एक चेतावणी असते.
ऑरेंज अलर्ट म्हणजे सतर्कतेचा इशारा असतो. या ठिकाणी खूप जोरात पाऊस पडू शकतो.
येलो अलर्ट म्हणजे संततधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना लक्ष द्यावे.